Breaking
28 Oct 2025, Tue

वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश : कोकणात नवे राजकीय समीकरण

खेड:​खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे महत्वाचे कोकणातील नेते वैभव खेडेकर यांनी अखेर भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) प्रवेश केला. गेल्या दीड महिन्यापासून रखडलेल्या त्यांच्या भाजप प्रवेशाची अखेर मुहूर्त सापडली आणि १३ ऑक्टोबरला त्यांनी भाजपमध्ये सामील होत आपल्या शेकडो समर्थकांसह कमळ हाती घेतलं. त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे आणि कोकणातील राजकीय समीकरण बदलू लागल्याची चर्चा निर्माण झाली आहे.राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसेमधून वैभव खेडेकर यांना पक्षातून काढण्यात आले होते. काही काळापासून पक्षाची धोरणे आणि अंतर्गत वादामुळे ते नाराज होते. तीन वेळा भाजप प्रवेश योजना रखडली, शेवटी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. यावेळी विविध पक्षातील अनेक कार्यकर्तेही भाजपमध्ये सहभागी झाले.

पक्षांतरणाच्या वेळी वैभव खेडेकर यांनी मनसेतील जुनी नाती तुटल्याचं दुःख व्यक्त केलं. “मनसेमध्ये तीन दशकांची वाटचाल करूनही अखेर नात्यांना विराम मिळाला – जुनी मैत्री तुटली, पण पुढील काळात परिसर विकासासाठी आणि भाजपच्या संघटना वाढीसाठी मी काम करणार,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.भाजप प्रवेशानंतर खेडेकरांनी कोकणातील विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला. “भाग्यवान आहे, मला नवी संधी मिळाली आहे. कोकणात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला प्रचंड यश मिळवून देऊ,” असं म्हणत त्यांनी संघटनात्मक विस्तारासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्णय घेतला आणि भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत रणनीती आखण्यास सुरुवात केलीवैभव खेडेकर हे कोकणातील जनसंपर्कात प्रगत नेते मानले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मनसेच्या स्थानिक संघटनेला फटका बसण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक निवडणुकांत भाजपाला थेट फायदा मिळू शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. दुसरीकडे, मनसेला संघटनात्मक नुकसान होऊ शकते.

वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा राजकीय अध्याय मानला जातो. जुनी नाती तुटली, आता कोकणात भाजपा मजबूत करणार, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. कोकणातील राजकारणात हा प्रवेश नवा रंग घेणार, तर आगामी निवडणुकांसाठी भाजपाची ताकद अधिक वाढणार, अशी राजकीय भविष्यवाणी अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

By Ruturaj Nalawade

Digital creator · Journalist · Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *