ठाणे – भारतात छुप्या मार्गाने येऊन भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी एका टेक्सस्टाईल कंपनीवर छापा मारून त्यांना अटक केली आहे.भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Thane crime branch PI Ashok Honmane) अशोक होनमाने यांना गुप्त माहिती मिळाली की, नऊ बांगलादेशी हे भारताचे अधिकृत पारपत्र (Indian Passport) अथवा बांगलादेशचा व्हिसा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने देशात आले आहेत. हे बांगलादेशी दलालाच्या मदतीने बांगलादेशातून हावडा रेल्वे स्टेशन येथे येवून रेल्वेने प्रथम कल्याण व नंतर भिवंडीतील सरवली येथे अनधिकृतपणे वास्तव्यास राहत होते. तसेच अवनी टेक्सटाईल्समध्ये (Avani textiles in Bhivandi) काम करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
भारतीय असल्याचे मिळविली बनावट कागदपत्रे भिवंडी गुन्हे शाखेने टेक्सटाईल छापा टाकला असता हे ९ बांग्लादेशी नागरिक कामगार म्हणून आढळून आले आहेत. या नऊ जणांनी बनावट पॅन कार्ड व आधार कार्ड तसेच पोस्ट ऑफिसचे पास बुक मिळविले. बनावट कागदपत्रे मिळवून ते सरकारला खरे असल्याचे भासवून सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले आहे.
ही आहेत आरोपींची नावे–
सलीम अमीन शेख( ३०), रासल अबुल हसन शेख (२७), मो.शाहीन मोहम्मद अकबर अली शेख (२४), मोहम्मद मासुम शोयदुल्ला इस्लाम(२१), तरुणमणीराम त्रिपुरा (२१), सुमनमनीराम त्रिपुरा (२१), इस्माईल अबुताहेर खान (१९), आजम युसूफ खान (१९), मोहम्मद आमीर अबुसुफियान (२६) अशी गजाआड करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.नऊ बांगलादेशींना कोनगाव पोलिसांच्या ताब्यात देऊन शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. बी. गिरासे करीत आहेत. बांगलादेशी नागरिकांच्या अटकेने भिवंडीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

